स्वभाव


आपला स्वभाव कसा होत  जातो?
आपण नेहमी म्हणतो, हा माझा स्वभाव आहे मी असंच वागते किंवा मी असंच वागतो...मी असं कधी करत नाही किंवा माझा तो स्वभावच नाहीय ..
पण या सगळ्याचं म्हणजे आपल्या या वागण्याचा आपल्याशी  ठराव कधी होत असतो!?? आपण त्याबद्दल इतके ठाम कसे काय होत असतो!?
 कुठून याची सुरुवात होते...  
अर्थात माझ्याच वागण्यानेच मला हे प्रश्न पडतात....
तर याचा विचार करताना मला जाणवलं की स्वभाव हा लहाणपणापासून म्हणजे अगदी हलकेच काही कळायला लागल्याच्या वयापासून प्रसंग,घटनेला,वस्तूला ,व्यक्तीला आपण जो जसा प्रतिसाद देत असतो.. समान प्रसंगांना तसाच किंवा त्यासारखाच प्रतिसाद देण्याची आपल्याला लागलेली सवय..
आणि मग ही सवय म्हणजेच आपला 'स्वभाव'. 
आणि मग या काही सवयींच्या मुळाशी जाताना मला हे काही सुचलंय... 
साधी गोष्ट आणि त्यासाठी आपला प्रतिसाद आणि मग आयुष्यभरासाठी आपला होणारा स्वभाव.. 
आपण नवीन घड्याळ घेतो ..
ही किती रोजची आणि साधीशी गोष्ट वाटते..
तर असं काही घेतो तेव्हा आपण जुन्या आणि नव्या अशा दोन्ही गोष्टींशी कसे वागतोय ह्यातला आपला प्रतिसाद आपला स्वभाव होतो .
काहीजण नवीन घेताच वापरू लागतात आणि जुन्याला विसरतात...काहीजण या स्थित्यंतरात थोडासा वेळ घेतात जुन्या नव्याची सांगड                     घालतात..आणि काहीजण नवीन घेताच वापरतात पण रोज जुन्याला मात्र स्पर्शाने तरी भेटतात... 
आपलं आवडीचं पेन किंवा आणखी काही हरवतं तेव्हा... 
आपण चटकन त्याचा विषय सोडून नवीन तसंच आणतो...वेळ नाही म्हणून आत्तापुरत दुसरं वापरतो वेळ मिळाल्यावर ते जुनं शोधतो... तर काही ते सापडल्याशिवाय श्वासच घेत नाहीत..
अशाच खूप गोष्टी जसं की आपल्या आवडीच्या वस्तू किंवा तसंच काही बिघडलं तर...कोणी आपल्याला न रुचणारी भेट दिल्यावर....नवीन घर घेतल्यानंतर जुन्या घराशी असलेलं नातं वगैरे वगैरे.. 
खूप आठवणी, खूप गोष्टी असतात 
आणि त्यांना आपले अनेक प्रतिसाद असतात...
आणि त्यातून तयार झालेला आपला स्वभाव असतो..
पण मग वस्तूंच्या जागी असलेला आपला स्वभाव नकळत नात्यांमध्ये ,प्रेमामधे आणि मैत्रीमध्ये उतरत असतो...
फक्त फरक इतकाच असतो की वस्तू वैज्ञानिक दृष्ट्या निर्जीव असल्याने आपल्या वागण्याला प्रतिक्रिया,प्रतिसाद  देत नाहीत.. (असं आपल्याला वाटतं) आणि जीवनात येणारी माणसं आपल्या या स्वभावाला प्रतिसाद देतात चांगला-वाईट-मध्यम कसाही...
खुपदा असं होतं की आपण आपल्या या सवयींच्या सामान्यपणे आपल्या स्वभावाच्या इतके प्रेमात असतो किंवा त्याच्याशी इतके एकरूप होतो की मग आपण त्याचे गुलाम होतो...

खुपदा कालागणिक किंवा नात्याच्या खोलीनुसार स्वभाव बदलण्यात ही गुलामी आडवी येते .. यालाच आपण सौम्य का असेना पण अहंकार (मराठीत इगो) मध्ये येतो असं म्हणून शकतोय  ..गरज असेल किंवा शक्य असेल तेव्हा असे बदल अपेक्षित असावेत स्वतःकडून  पण,आपण आपल्या या comfort zone च्या बाहेर जायला कचरतो  आणि तेव्हाच अनेक गोष्टीमध्ये थोडा थोडा थोडा कचरा आपण साचवत असतो... 
स्वभाव असावा आपण त्याला जपावं कारण तोच आपलं व्यक्तिमत्त्व जगासमोर मांडत असतो आणि आपल्या मनातही....⁠⁠⁠⁠
मी का? हा प्रश्न नसावा  ना आपल्याला! कारण वैयक्तिक स्वभावाला जपण्यापेक्षा खूपदा  जपलेली नाती जास्त आनंद देऊ शकतात :)



स्वभावाने सगळं बदलण्यापेक्षा थोडा स्वभावच बदलला तर सोप्पंय ! पुन्हा यातही नेमकं किती आणि काय बदलावा हा विवेक बाळगायला हवाच आहे !!
शेवटी काय ते एकच... सवयी असाव्यात पण त्यांची सवय नसावी!!!
मोकळं जगावं ! आनंदी जगावं ... स्वभावाला तरी का आपल्यावर राज्य करू द्यावं ! ;)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

सासर-माहेरच्या गोष्टी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "